Sunday, 29 September 2019

लहानपणीची गाणी


फार पूर्वी कुठून तरी कॉपी केलेल्या म्युझिक फोल्डर मधली गाणी ऐकायचा सपाटा लावलाय सध्या. त्यातली क्लासिकल फोल्डर मधली जवळपास सगळीच आता आता ओळख झालेली आहेत. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी तश्या नव्या आहेत.
हिंदी गाणी काही माहीत आहेत, बरीचशी नवीन आहेत. ती गाणी ऐकायला लागले की मला रात्री 9 30 -10 वाजता रेडिओवर गाण्याचा कार्यक्रम लागलाय, मी जागून बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स असल्या कोणत्यातरी विषयाचा कॉलेजचा अभ्यास करतेस असा फिल यायला लागतो.
मराठी गण्यातली जवळपास सगळीच गाणी माझ्या अत्यंत आवडीची आणि लाडकी आहेत. आणि गंमत म्हणजे यातलं कडवं न कडवं माझं पाठ आहे, हे मला आताच जाणवतंय. माणिक बाईंची भक्तीगीतं लावली की पहाट झाल्याचा भास होतो. बाकी इतर सुमन, लता, अरुण दाते, हृदयनाथ, यांची भावगीतं लावली की मला माझे शाळेचेच दिवस आठवतात. ती गाणी ऐकताना निवांत दुपारी गूळ तूप पोळीचा लाडू चघळून चघळून खातेय असं वाटत राहतं.
पण बाबूजींची गाणी ऐकताना तर हाईटच होते. पूर्वी 'स्वर आले जुळूनी' या नावाची कॅसेट होती. मी तेव्हा अगदी पहिली किंवा जास्तीत जास्त दुसरीत असेन. मी अनेकदा शाळा सुटल्यावर मधल्या काकांच्या घरी जायचे आणि मग रात्री आठ साडे आठ वाजता धाकटा काका मला आमच्या घरी घेऊन यायचा. त्याच्याकडे तेव्हा त्या काळातली सुप्रसिद्ध मारुती 800 गाडी होती. तो मला त्या कारनं घरी आणायचा त्या 25-30 मिनिटांच्या त्या सावकाश प्रवासात ही एकच कॅसेट आलटून पालटून तो लावायचा. त्यामुळे आजही जवळपास 25/26 वर्षांनी ही गाणी ऐकताना मला पुन्हा त्या कार मध्ये मागच्या सीटवर बसून डोळे मिटून ही गाणी ऐकतेय की काय असा भास व्हायला लागतो. अगदी रस्त्यातून जाताना होणारे लहान लहान जर्क्स सुद्धा जाणवायला लागतात!
त्या वयानन्तर ही सगळी गाणी अनेकदा ऐकली असणार पण हेच ठसे मनावर अमीटपणे का टिकून राहावेत?
ही निवडक गाणी याच क्रमानं पुन्हा ऐकताना माझं बालपणच मला मला परत भेटायला आल्यासारखं वाटतंय..
अमृता देशपांडे

Friday, 27 September 2019

गाणी मी आणि बाबा

यशवंत हो, जयवंत हो...

करकमळाच्या देठाभवती झिम्मा खेळे प्रीत बिलवरी...

किंवा सावळाच रंग तुझा,माझ्या मनी झाकळतो...

या ओळी कधीही ऐकल्या की मनात एक निवांतपणा, समाधानाची अनुभूती भरून राहते.
कोणतंही गाणं आपण अगदी पहिल्यांदा कधी ऐकलं ते आठवणं कधी कधी शक्यच नसतं कारण ही गाणी अपल्यासोबतच मोठी झालेली असतात. ही गाणी आपल्या जीवनाचा एक भागच होऊन जातात, त्यांना वेगळं काढताच येत नाही..
बाबांना गाण्याची विशेष आवड आहे. घरी  रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर कायम चालूच असतो. लहान असताना कधी शाळेला सुटी असली की ते माझ्यासाठी कायम घरी असायचे. त्या वेळी या गोष्टीचं फार काही महत्व वाटलं नाही पण आता जेव्हा कुणाला काही देताना सर्वात मौल्यवान गोष्ट ही वेळ असते, तेव्हा या गोष्टीचं महत्व पटतं.
बाबा घरी असायचे तेव्हा मी दुपारी शाळेतून यायच्या वेळी गूळ, तूप पोळीचा लाडू करून ठेवायचे. शनिवारचा हा खास बेत असायचा.
टेप वर गाणं चालू असायचं...
पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये..

खाऊन झाल्यावर ते जे काम करत असतील त्यात मलाही सोबत घेऊन जायचे. आमची जाईची वेल खूप वाढली होती. त्यामुळे बेडरुमची एक खिडकी जवळपास उघडायचीच नाही. हीच वेल गच्चीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे गच्चीत पालपाचोळ्याचा नेहमी खच पडायचा. गच्ची नेहमी झाडावी लागायची. दुपारी ते मला घेऊन जायचे गच्ची झाडायला.
रेडिओवर गाणी चालू असायची,

त्या तरुतळी विसरले गीत, हृदय रिकामे घेऊन फिरतो, जिथे तिथे ते गीत...
किंवा
स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी...

सगळ्या सगळ्या वातावरणातच एक निवांतपणा, शांतता ,भरल्या पोटी आलेला पेंगुळलेपणा आणि समाधान या भावना भरून राहिल्या होत्या.

त्या वेळी या गाण्याचे अर्थ कळायचे नाहीत. पण ही गाणी आजही पुन्हा ऐकली की पुन्हा त्याच भावना दाटतात.

पण इतक्या वर्षांनी आज मला हे लिहावंसं वाटलं कारण आज अभिनव त्याच वयात आहे आणि काल मी गुणगुणल्या नंतर तो ही माझ्यामागे म्हणायला लागला...
यशवंत हो, जयवंत हो...

Wednesday, 28 August 2019

पश्चिमा

उगवत्या सूर्याची मला तमा नाही,
सगळे त्याचीच वाट पाहत असतात...

प्रिय मित्रा,
मी जर दिशा असले असते,
तर मी पश्चिमा झाले असते...

प्रत्येक मावळतीला
तू घरी येताना,
दारात तुझी वाट पाहत थांबले असते..

Tuesday, 27 August 2019

राजाला गाढवाचे कान आहेत, राजाला गाढवाचे कान आहेत...

माझी एक आत्या आजी होती. आत्या आजी म्हणजे बाबांची आत्या, आजोबांची मोठी बहीण. तिला सगळेच अक्का आत्या म्हणायचे. कधी कधी ती आमच्याकडे राहायला यायची. फार थकली होती. मग राहायला आल्यावर आम्हाला छान छान गोष्टी सांगायची. आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायची. ती आली की लवकर जेवणं करून मुद्दाम लाईट बंद करून आणि झिरोचा बल्ब लावून मिणमिणत्या प्रकाशात आम्ही सगळ्या बहिणी तिच्याभोवती कोंडाळं करून बसायचो. मग ती आम्हाला गोष्टी सांगायची. 
एक राजा होता. राजाकडे सगळं होतं. पैसा, सत्ता, सुख, शांती, समृद्धी सगळं काही होतं. फक्त एकच अडचण होती. ती म्हणजे त्याला गाढवाचे कान होते. इतर वेळी राजमुकुटाखाली ते आपोआपच झाकले जायचे. त्यामुळे प्रजेला किंवा कुणालाच ते कळणं शक्य नव्हतं. पण जेव्हा महिन्यातून एकदा केस कापायची वेळ यायची तेव्हा मात्र राजा खूप गुप्ततेनं एका निष्णात न्हाव्याला रात्रीच्या वेळी बोलावून घ्यायचा. त्याचे डोळे बांधले जायचे आणि मग राजाचे सगळे नोकर तिथून निघून जायचे आणि मग राजा एकांतात त्या न्हाव्यासमोर आपला राजमुकुट उतरवायचा. तो न्हावी मग चाचपडत चाचपडत राजाचे केस कापायचा. आणि नन्तर राजा पुन्हा राजमुकुट घालून बाहेर निघून जायचा आणि मगच त्या न्हाव्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली जायची. 
पण या सगळयामागचं रहस्य मात्र कुणालाच कळायचं नाही. एकदा तो न्हावी राजाचे केस कापून बाहेर येत असताना दारावरचा रखवालदार त्याला विचारतो. "राजा तुला नेहमी रात्रीच का बोलावून घेतो? आणि त्यातूनही तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधतो. असं का? यामागचं रहस्य काय?"
त्या वेळी त्या प्रश्नाचं उत्तर त्या न्हाव्यालापण देता येत नाही. पण आता मात्र तो त्या प्रश्नानं पुरता व्याकुळ होऊन जातो. आणि पुढच्या महिन्यात आमंत्रण आलं की काहीतरी करून डोळ्यांची पट्टी काढून काय आहे ते पाहायचं असा निश्चय करतो. तो कसाबसा एक महिना घालवतो. आणि आमंत्रण आलं की उत्सुकतेनं राजाकडे जातो. आणि केस कापताना हळूच डोळ्यावरची पट्टी काढून पाहतो तर त्याच्या लक्षात येतं, 'राजाला गाढवाचे कान आहेत!!' बस्स!! कशीबशी राजाची कटिंग उरकतो आणि बाहेर पडतो. त्याला रात्रभर झोप लागत नाही. आपल्याला हे रहस्य कळलंय हे त्याला कुणाला कळू द्यायची इच्छाही नसते आणि ते सत्य त्याच्या पोटात राहायलाही तयार नसतं. त्याचं पोट दिवसेंदिवस वाढायला लागतं आणि दिवसेंदिवस जास्त जास्त दुखायला लागतं. आता काय करावं हा विचार करताना तो एका जंगलात पोहोचतो. शेवटी एका झाडाच्या बुंध्यापाशी तो हळूच ते राजाचं रहस्य सांगून मोकळा होतो, "राजाला गाढवाचे कान आहेत. राजाला गाढवाचे कान आहेत." आणि मग तो त्या रात्री घरी जाऊन शांतपणे झोपतो. 
थोड्या दिवसांनी एक सुतार तिथे येतो आणि ते झाड कापून घेऊन जातो. त्याच लाकडाची मग तो वाजवायची पेटी तयार करतो. आणि पेटी तयार झाली की आता वाजवून पाहू म्हणून वाजवायला लागतो तर त्या पेटीतून आपोआपच आवाज येतो, "राजाला गाढवाचे कान आहेत. राजाला गाढवाचे कान आहेत." 
अत्याआजीची गोष्ट इथंच संपते पण आज मला अचानक ती आठवली आणि वाटलं आपण सगळेच कधीतरी आपले गाढवाचे कान लपवणारे राजे असतो का?
..अमृता देशपांडे

Friday, 16 August 2019

ग्रेस


ग्रेस 
गूढ, गहन, गभिरग्रेस..ग्रेसांबद्दल लिहायचं ठरल्यानंतर त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेली काही पुस्तकं मिळतात का हे बघण्यासाठी मी जवळच्याच वाचनालयात गेले आणि तिथल्या ग्रंथपालाला ग्रेसांची काही पुस्तकं असतील तर द्या असं म्हटलं त्या बाईं सहजच ग्रेस खरंच मोठे कवी होते नं? असं म्हटलं. पण मला मात्र ग्रेस अजून गेले कुठे, ते आहेतच की अजून. असा उगाचच एक भास होऊन गेला. नंतर विचार करताना तो भास नव्हता असंही जाणवलं, कारण ग्रेस आहेतच की प्रत्येक माणसात! कारण ग्रेस ही काही नश्वर व्यक्ती नव्हे..तो एक विचारांचा, अभिव्यक्तीचा, कल्पनेचं बंड करणारा आणि स्वत:ला माणसाच्या सुखापेक्षा दु;खाचा प्रतिनिधी मानणारा अखंड कोसळणारा प्रपातच आहे!!
असं म्हणण्याचं कारण म्हणजे ते स्वत:च स्वत:ला दु:खाचा महाकवी म्हणतात. ते म्हणतात,
मी महाकवी दु:खाचा, प्राचीन नदीपरी खोल,
दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल
मी पुरुष असताही तू बिल्वर मजला भरले,
करुणेच्या सर्व कळांचे डोहाळे मज लागले..
या ओळी वाचताना, दु:खातूनही समरसून जगताना, दु:खाच्या दगडाचे याचकाला मात्र नेहमी आनंदाच्या फूलात रुपांतर करुन देणार्या राधेयाची आठवण होते.. !!
खरंतर ग्रेस हा काही समोर दिसेल ती वस्तूस्थिती यमकं जूळवून लिहीणारा कवी नाही. त्यांच्या अभिव्यक्तीचा प्रकारच पूर्ण वेगळा आहे. त्यांच्या उपमा, त्यांची शब्दयोजना आणि त्यांच्या कल्पना या खोल अंतरात्म्यातून घूमल्यासारख्या प्रतिध्वनीत होत होत शब्दरूप घेऊन आपल्यापतर्यन्त पोहोचतात तेव्हा त्यांची एक गूढरम्य कवीता झालेली असते.
त्यामुळे ग्रेसांच्या कवितेचा काही एकच असा अर्थ कधी निघत नाही. प्रत्येकाला तो आपापल्या कुवतीप्रमाणे उलगडत जातो. त्यामुळे मला सुरुवातीला अश्या दुर्बोध वाटणार्या माणसात असामान्य कवी आहे हे कोणी ओळखलं असेल? आणि या माणसातलं कवित्व जगासमोर आणणार्या माणसाची प्रज्ञा आणि मेधा किती प्रचंड विस्तारलेली असेल असे बाळबोध प्रश्न मला नेहमी पडायचे. एका ठिकाणी त्याच माणसानं खुलासा केला आहे.
मी असा एकदा नागपूरच्या रस्त्यावरनं जात होतो. तेव्हा समोरुन दोन माणसं येताना दिसली. त्यातला एक पायानं अधू होता आणि तो दुसर्याचा आधार घेऊन जात होता. मी त्या दोघांशी बोललो तेव्हा त्या दोन महारथींची नावं सुरेश भट आणि माणिक गोडघाटे असल्याचं कळलंत्यानंतर मी त्यांना काही कवीता मागितल्या आणि मीच त्या कवितांना चाली लावणार होतो.
 त्यातले माणिक गोडघाटे म्हणजेच आपले कवी ग्रेस आणि हा प्रसंग सांगणारे संगीतकार म्हणजे आपले लाडके  पंडित हृदयनाथ मंगेशकर हे होते!!

माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७  रोजी नागपुरात झाला. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर
या गावचा माझा जन्म, माझी नाळ तोडून याच गावच्या मातीत गाडली गेली. इथे माझे शिक्षण झाले. बाकीच्या सगळ्या वयाच्या, आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या परिक्रमा ईथेच सुरु आहेत. ईश्वराची कृपा हा माझ्या जगण्याचा मुलाधार आहे. मी सकाळी ४ वाजता उठतो आणि पोहायला जातो, जेव्हा कुणालाही जाग आलेली नसते तेव्हा मी पोहून परत आलेला असतो. कारण मला लिहायचं असतं, मला माझ्या प्रार्थना उभ्या करायच्या असतात. मी म्हणतो, “माझ्या तथाकथित निर्मिती विश्वावर जीव जडवणार्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला सुखाचे ठेव. आणि देवा जर जमले तर या माझ्या निमुळत्या, छोट्याश्या बालमुठीतल्या प्रचंड आणि इवल्याश्या कवितेवर जगात कुणालाही मात करु देऊ नकोस. देवा त्याबरोबरच माझ्या सभ्यपणावरही कुणालाच मात करु देऊ नकोस.. poetry is not my achievement.How poetry will be my achievement my dear friends and my der enemies? Had it been my achievement then दोन ग्रेस झाले असते तीन ग्रेस झाले असते..पण ग्रेस एकच आहे.
हे ही दुर्बोध आहे का हो? महणजे गेली ३५ वर्षे महाद्वाराने आणि मागच्या दाराने माझी कविता गुणगुणता  आणि मलाच काहीतरी डोळे वटारुन का पहाता मेलं? सात पुस्तकं लिहिली तरी मी भाषण देऊन स्पष्टीकरणच देऊ का? हे मला नाही कळत. हा काय मतलब आहे मला कळतच नाही. माझ्या पेशींचे तुकडे पडत गेले , माझ्या हृदयातलं रक्त झडत गेलं आणि तुम्हाला कुठलीही झुळूक जखम करत नाही..याला काय अर्थ आहे?”
मला स्वत:ला भाबडेपणाने असे वाटते की कवीचे जगणे आणि त्याचे तथाकथित लिखणे यातून त्याच्या शरीराची आणि तितकीच त्याच्या आत्म्याची झीज होत असते आणि काहीवेळेला हा आघात आणि स्फोट जर जबरदस्त असतील तर त्याचे तुकडेही पडत असतात. ती झीज आणि पडलेले तुकडे पुन्हा जोडता येत नाहीत. असा माझा समज आहे.

शेवटच्या काही दिवसांत ग्रेस पुण्यातच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात होते. तेव्हा त्यांना अमेरिकेत रहात असलेला एक मराठी मुलगा भेटायला आला आणि त्यानं खूप प्रेमानं ग्रेसांना अमेरिकेला त्याच्या घरी रहायला यायचं आमंत्रण दिलं. त्यावर ग्रेस म्हणाले मी नक्की येईन अमेरिकेला, जगायला नाही मरायला!! त्या मुलाला काही कळेना, मरायला येईन हा काय प्रकार आहे? यावर ग्रेसांनीच खूलासा केला..या भुमीचे माझ्यावर इतके उपकार आहेत की मी इथे मरु इच्छित नाही. या प्रसंगी ग्रेस कवितेतून काय म्हटले असते?
भळभळती जखम माझ्या भाळावर अश्वथाम्यासारखी,
संध्याकाळचा तो एकाकी निरवपणा माझ्या माथ्यावर,
दु:खाचे ते बुडून विरुन जाण्याचे  अलोट क्षण माझ्या शीरावर,
पण मी त्या दु:खाचा पर्वत पार करुन तुझ्या दारी आलोय,
तू मला इतकं दिलयस,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
तू मला तुझ्या भूमीवर प्रसवलंस,
माझ्या कवितांना प्रसवलंस,
तुझ्या मुशीतून ग्रेस जन्माला घातलास,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
की हे मराठी माते,
मी तुझ्या भुमीवर मरु इच्छित नाही!!

२६ मार्च २०१२ या दिवशी ग्रेस यांना याच ठिकाणी परलोकाचं आमंत्रण आलं आणि ते म्हणून गेले
मी खरेच दूर निघालो, तू येऊ नको ना मागे..



  ….अमृता देशपांडे
     amrutadeshpande.1414@gmail.com


Thursday, 15 August 2019

अन्न


अन्न
माणसाच्या अन्नाच्या प्रवासाबद्दल जे काही आतापर्यंत वाचलंय, त्यावरून काही गोष्टी कळल्या. माणसाची उत्क्रांती  आणि त्याच्या बरोबर निसर्गामध्ये झालेले बदल, हिम पर्व ते ऋतूंची निर्मिती, एप ते माणूस हे तिन्ही प्रवास काळाच्या साधारणतः एकाच टप्यात घडत गेले, एकमेकांना पूरक ठरले. 
साधारणतः ९-१० हजार वर्षांपूर्वी माणूस निसर्ग, पाऊस पाणी, सूर्य-चंद्र- पृथ्वी यांचं परिभ्रमण यांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्यामुळे कोसळणारा पाऊस, लकाकणाऱ्या विजा, सूर्याचं उगवणं- मावळणं, या गोष्टींचं त्याच्या मनात कुतुहुल होतं तसंच या निसर्गशक्तीची भीती सुद्धा होती. या भीतीतूनच मग कोणीतरी अज्ञात शक्ती हे सर्व घडवून आणते असा विश्वास दृढ होत गेला आणि जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना सुरू झाल्या. यातूनच पुढे अनेक धर्म निर्माण झाले. तेव्हा उजेडाचं आकर्षण होतं, तसंच अंधाराची भीतीही होती. अंधार पडला, सूर्य मावळून गेला की सगळं जीवनच ठप्प होत असावं; आणि चमत्कार झाल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला की आनंदी आनंद!! दिवसाचा वेळ जेवढा तेवढाच कामाचा, जागं राहण्याचा वेळ.  माणूस फळं, कंदमुळं, बेरीज, लहान लहान कीटकं असं काहीही खात होता पण मुख्य अन्न हे शिकारीवर अवलंबून होतं. त्या काळीसुद्धा लिंग आणि वयानुसार श्रमविभागणी झाली होती. स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध माणसे  वस्तीच्या जवळपास फळं आणि लहान सहान कीटकं गोळा करायची. पुरुष मात्र दिवसभर शिकार करायला जायचे. जी शिकार मिळेल ती संध्याकाळी सगळे मिळून  समारंभपूर्वक खायचे. यातूनच 'डिनर'चा उगम झाला. डिनर म्हणजे कामाचा दिवस संपल्यावर संध्याकाळी, सर्वांनी मिळून भरपेट करायचे जेवण!  त्यांनतर अंधार पडल्यावर माणूस काहीच करू शकत नसायचा. त्यामुळे एका जागी शांतपणे झोपणं किंवा बसून राहणं याशिवाय पर्याय नव्हता. उजाडलं की ब्रेक फास्ट! त्या काळी खरोखरच रात्रीचा उपास घडत असणार आणि हा उपाशी राहण्याचा कालावधी मोठा असणार. म्हणून उजाडल्यावरच्या खाण्याला ब्रेकफास्ट म्हटलं गेलं असावं. ब्रेकफास्ट म्हणजे आधल्या रात्री जे काही मांस उरलेलं असेल ते आणि त्या सोबत गोळा केलेली फळं इत्यादी. हा ब्रेकफास्ट करून माणसं पुन्हा शिकारीला निघत, स्त्रिया गॅदरिंग म्हणजे गोळा करण्याच्या, जमवून ठेवण्याच्या कामाला लागत. हे करतांनाच स्त्रियांनी बियांपासून झाडं कशी उगवतात, त्यांना परत फळं कशी येतात हे निसर्गाचं निरीक्षण करून समजून घेतलं. यातूनच माणसाचा पहिला सृजनाचा आविष्कार म्हणजे शेती चा उगम झाला! म्हणजे पहिली शेतकरी ही स्त्री होती!!  मधल्या काळात म्हणजे आठ हजार वर्षांपूर्वी माणसाला आगीचा शोध लागला. ही आग माणसाला उजेड आणि ऊब द्यायची! माणसाचं हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण करायची. त्यातूनच अन्न कधीतरी आगीत भाजून खाल्लं गेलं आणि 'पाककला' विलक्षण गोष्टीचा उगम झाला. पण याच आगीमुळे माणसाचा जागं राहण्याचा वेळ वाढला. त्यातूनच मग ब्रेक फास्ट आणि डिनर यांच्या मध्ये काहीतरी खाण्याची गरज निर्माण झाली. या दुपारच्या वेळी सगळे कामात असतात पटकन काहीतरी सुटसुटीत खाऊन परत कामाला लागायचं असतं. तेव्हा आकाराने मोठे, सूप सारखे पातळ पदार्थ टाळून, सँडविच, बर्गर, पिझ्झा, पेस्टी (पेस्ट्री नव्हे), सारखे हात जास्त खराब न होता, उभ्या उभ्या किंवा कामाच्याच टेबलावर  बसून काम करता करता खाण्याचे पदार्थ निघाले असावेत. सतराव्या शतकात याला 'लंचॉन' हे नाव मिळालं. काळाच्या ओघात ते नाव सुद्धा माणसाने सुटसुटीत करून 'लंच' करून टाकलं!! आता ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे खाण्याचे प्रकार नियमित झाले होते, सगळीकडे accept झाले होते. मध्ये नवव्या शतकात कलदी नावाच्या मेंढपाळाला कॉफीचा शोध लागला होता आणि सगळ्या जगाला दारू आणि पाणी यांच्याशिवाय एक चांगलं स्फुर्तीदायक पेय मिळालं होतं! नन्तर सकाळी उठल्यावर मरगळ घालवण्यासाठी कॉफी प्यायला सुरुवात झाली. चहा तर इसवी सना पूर्वी दोन हजार वर्षांपासून चीन मध्ये पिला जात होता. तिथून तो सगळीकडे पसरला. अठराव्या शतकांनंतर जीवनाने सगळीकडेच वेग घेतला होता. अनेक शोध लागत होते. चाक, सायकल, गाड्या, वाफेचं इंजिन, वाचन- लिखाणाची मध्यमं, करमणुकीची साधनं वाढत होते. हिंदुस्थान, चीन, इजिप्त मध्ये अनेक संस्कृती उदयाला येत होत्या. कला, शास्त्र, तत्वज्ञान, मॅनेजमेंट या गोष्टींनी माणसाच्या जीवनाला अनेक पदर मिळत होते. जीवन म्हणजे 'फक्त जिवंत राहून वेळ व्यतीत करणं' ही आदिमानवाची कन्सेप्ट केव्हाच मागं पडली होती. माणसाचे एका दिवसात सक्रिय राहण्याचे तास वाढत चालले होते. १८०० साली विजेच्या दिव्याचा शोध लागला. आता माणूस रात्री जास्तच सक्रिय राहू लागला होता. तशी डिनरची वेळ पुढे पुढे चालली होती. आधी सूर्यास्ताच्या सुमारास होणारं डिनर आता ८ -८:३०वाजता व्हायला लागलं. त्यामुळेच मग लंच आणि डिनर च्यामध्ये काहीतरी खायची गरज निर्माण झाली. इंग्लंडचा ड्युक ऑफ बेडफोर्ड फ्रान्सिस रसेलची बायको अँना मारिया हिला सुद्धा भुकेने वेड लागायची वेळ यायची. यावर तोडगा म्हणून तिने १८३९साली तिनं आपल्या नोकरांना दुपारी पाच वाजता चहा आणि त्या बरोबर काही केक रोज वाढायला सांगितलं. हीच 'हाय टी' ची सुरुवात. म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यावर चहा पितो, नाष्टा मग दुपारचं जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण करतो त्यामागे इतका मोठा इतिहास असेल असं वाटलं होतं
आत एकविसाव्या शतकात माणसाला दिवसाचे चोवीस तास सुद्धा अपुरे पडायला लागलेत.. म्हणूनच की काय आजचे आहारतज्ज्ञ दर दोन तासांनी खायचा सल्ला देतात....

Wednesday, 14 August 2019

पुरीया धनाश्री...


पुरीया धनाश्री...

सकाळपासून काम, घाई गडबडीचं सुरू झालेलं अव्याहत चक्र संध्याकाळ व्हायला लागली की थोडं रेंगाळतं. शरीराबरोबरच मनालाही थोडासा थकवा आलेला असतो. सगळ्यांचं सगळं करता करता कधी आनंद होतो पण बऱ्याचदा आपल्याला काय पाहिजे होतं तेच विसरायला होतं! या सूर्य कलण्याच्या वेळी, आपापल्या घरी जाण्याच्या वेळी, आभाळ संधीप्रकाशानं भरून जाण्याच्या वेळी ऐकायचा हा राग..

आजरा दिन डुबा
अब तू ध्यान धरिलो रे ।।
साँज आई घेरी है
रंग जो चाहे भरिलो रे ।।

 पंडित कुमार गंधर्वांनी ही बंदिश ग्रीष्मातल्या संध्याकाळसाठीच योजली होती.
आता दिवस मावळतीला आला आहे. केलंस नं दिवसभर काम, दगदग केलीस. आता जरा शांत बस, एकाग्र हो. स्वतःच्या आत काय चाललंय ते बघ जरा. दिवसभर सगळ्यांच्या मागण्या पुऱ्या करता करता तुला स्वतःला नेमकं काय पाहिजे हे विचारलंस का कधी स्वतःला? आता विचार. बघ ती ग्रीष्मातली संध्याकाळ तुला काहीतरी देतेय, जणू आभाळाचा रिकामा कॅनव्हास तुझ्यापुढे अंथरलाय जो पाहिजे तो रंग भर..सगळं तुझ्या हातात आहे. जरा शांत होऊन विचार तर करून बघ!!!
हेच तर त्या पुरीया धनाश्री ला सांगायचं नसेल?? असा विचार गेले अनेक दिवस मन व्यापून होता. 

पण सगळ्यात पहिल्यांदा जो पुरीया धनाश्री ऐकला होता त्यांनतर अगदी वेडच लागलं होतं. त्याचं वर्णन मी कधी तरी लिहून ठेवलं होतं...
"आता अगदी अमृता प्रीतम सारखं झालंय माझं. स्वयंपाक करताना अचानक काहीतरी सुचतं आणि मग लिहायची उर्मी शांत बसू देत नाही. जे मनात आलं आहे ते कागदावर उतरवल्याशिवाय शिवाय चैनच पडत नाही. हातातलं काम पूर्ण करू आणि मग लिहू म्हटलं की तेव्हा सुचलेल्या कल्पना तितक्याश्या मोहक वाटत नाहीत. त्यामुळे आता तशीच बसलेय लिहायला, स्वयंपाक अर्धवट टाकून...
संध्याकाळचे ६-६:३० वाजले आहेत. भीमसेनांचा पुरीया धनाश्री चालू आहे, त्या तालावर माझं भाजी चिरणं, पोळ्या लाटणं चालू आहे. हा राग ऐकायची हीच खरी वेळ. ते ऐकण्यात मी इतकी दंग होऊन गेले होते की मला हे गाणं नसून एक पंचेंद्रिय व्यापून टाकणारा एक अनुभवच वाटला. 
गाणं संपलं आणि काही सेकंदानी मला अचानक उन्मळून रडूच यायला लागलं. रडण्याचा पहिला भर ओसरल्यावर मलाच प्रश्न पडला का रडत होते मी? अं? आठवेचना काय झालंय...मग लक्षात आलं, भीमसेनजींच्या पुरीया धनाश्रीनं एव्हढी प्रचंड हुरहूर आणि ओढ लावली होती की मला जीवाच्या जीवलगाची ताटातूट झाल्यासारखंच वाटलं! खरंतर हा योग्य वेळी योग्य ते आणि महान ताकदीच्या गायकाचं गाणं ऐकल्याचा परिणाम होता!! 

फार पूर्वीपासून पुरीया धनाश्री मला सूर्यास्ताच्या वेळेस प्रियकराची वाट बघणाऱ्या विरहिणीसारखा वाटत आलाय. संध्याकाळची वेळ आहे. ती हिरवी नऊवारी नेसून, वेणी-फणी करून वाड्याच्या दारात उभी आहे. दाराच्या शेजारच्या पंचकोनी कोनाड्यात तिनं दिवा लावला आहे. त्या प्रकाशात दाराचे पितळी कडी-कोयंडे, सागवानी पॉलिश चमकतंय. आकाशात केशरी-कातर रंग पसरलाय. तोच रंग तिच्या आरक्त, वाट पाहणाऱ्या चेहऱ्यावर उतरलाय. डोळे दूरदूरपर्यंत कोणालातरी शोधताहेत. वाऱ्याच्या मंद झुळुके बरोबर तिच्या केसांची एक बट गालावर रेंगाळतेय. ती तशीच उभी आहे, एका दाराला रेलून, त्याची वाट पाहत ओढीनं... अजूनही पुरीया धनाश्री!!!"


सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...