Sunday 29 September 2019

लहानपणीची गाणी


फार पूर्वी कुठून तरी कॉपी केलेल्या म्युझिक फोल्डर मधली गाणी ऐकायचा सपाटा लावलाय सध्या. त्यातली क्लासिकल फोल्डर मधली जवळपास सगळीच आता आता ओळख झालेली आहेत. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी तश्या नव्या आहेत.
हिंदी गाणी काही माहीत आहेत, बरीचशी नवीन आहेत. ती गाणी ऐकायला लागले की मला रात्री 9 30 -10 वाजता रेडिओवर गाण्याचा कार्यक्रम लागलाय, मी जागून बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स असल्या कोणत्यातरी विषयाचा कॉलेजचा अभ्यास करतेस असा फिल यायला लागतो.
मराठी गण्यातली जवळपास सगळीच गाणी माझ्या अत्यंत आवडीची आणि लाडकी आहेत. आणि गंमत म्हणजे यातलं कडवं न कडवं माझं पाठ आहे, हे मला आताच जाणवतंय. माणिक बाईंची भक्तीगीतं लावली की पहाट झाल्याचा भास होतो. बाकी इतर सुमन, लता, अरुण दाते, हृदयनाथ, यांची भावगीतं लावली की मला माझे शाळेचेच दिवस आठवतात. ती गाणी ऐकताना निवांत दुपारी गूळ तूप पोळीचा लाडू चघळून चघळून खातेय असं वाटत राहतं.
पण बाबूजींची गाणी ऐकताना तर हाईटच होते. पूर्वी 'स्वर आले जुळूनी' या नावाची कॅसेट होती. मी तेव्हा अगदी पहिली किंवा जास्तीत जास्त दुसरीत असेन. मी अनेकदा शाळा सुटल्यावर मधल्या काकांच्या घरी जायचे आणि मग रात्री आठ साडे आठ वाजता धाकटा काका मला आमच्या घरी घेऊन यायचा. त्याच्याकडे तेव्हा त्या काळातली सुप्रसिद्ध मारुती 800 गाडी होती. तो मला त्या कारनं घरी आणायचा त्या 25-30 मिनिटांच्या त्या सावकाश प्रवासात ही एकच कॅसेट आलटून पालटून तो लावायचा. त्यामुळे आजही जवळपास 25/26 वर्षांनी ही गाणी ऐकताना मला पुन्हा त्या कार मध्ये मागच्या सीटवर बसून डोळे मिटून ही गाणी ऐकतेय की काय असा भास व्हायला लागतो. अगदी रस्त्यातून जाताना होणारे लहान लहान जर्क्स सुद्धा जाणवायला लागतात!
त्या वयानन्तर ही सगळी गाणी अनेकदा ऐकली असणार पण हेच ठसे मनावर अमीटपणे का टिकून राहावेत?
ही निवडक गाणी याच क्रमानं पुन्हा ऐकताना माझं बालपणच मला मला परत भेटायला आल्यासारखं वाटतंय..
अमृता देशपांडे

Friday 27 September 2019

गाणी मी आणि बाबा

यशवंत हो, जयवंत हो...

करकमळाच्या देठाभवती झिम्मा खेळे प्रीत बिलवरी...

किंवा सावळाच रंग तुझा,माझ्या मनी झाकळतो...

या ओळी कधीही ऐकल्या की मनात एक निवांतपणा, समाधानाची अनुभूती भरून राहते.
कोणतंही गाणं आपण अगदी पहिल्यांदा कधी ऐकलं ते आठवणं कधी कधी शक्यच नसतं कारण ही गाणी अपल्यासोबतच मोठी झालेली असतात. ही गाणी आपल्या जीवनाचा एक भागच होऊन जातात, त्यांना वेगळं काढताच येत नाही..
बाबांना गाण्याची विशेष आवड आहे. घरी  रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर कायम चालूच असतो. लहान असताना कधी शाळेला सुटी असली की ते माझ्यासाठी कायम घरी असायचे. त्या वेळी या गोष्टीचं फार काही महत्व वाटलं नाही पण आता जेव्हा कुणाला काही देताना सर्वात मौल्यवान गोष्ट ही वेळ असते, तेव्हा या गोष्टीचं महत्व पटतं.
बाबा घरी असायचे तेव्हा मी दुपारी शाळेतून यायच्या वेळी गूळ, तूप पोळीचा लाडू करून ठेवायचे. शनिवारचा हा खास बेत असायचा.
टेप वर गाणं चालू असायचं...
पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये..

खाऊन झाल्यावर ते जे काम करत असतील त्यात मलाही सोबत घेऊन जायचे. आमची जाईची वेल खूप वाढली होती. त्यामुळे बेडरुमची एक खिडकी जवळपास उघडायचीच नाही. हीच वेल गच्चीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे गच्चीत पालपाचोळ्याचा नेहमी खच पडायचा. गच्ची नेहमी झाडावी लागायची. दुपारी ते मला घेऊन जायचे गच्ची झाडायला.
रेडिओवर गाणी चालू असायची,

त्या तरुतळी विसरले गीत, हृदय रिकामे घेऊन फिरतो, जिथे तिथे ते गीत...
किंवा
स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी...

सगळ्या सगळ्या वातावरणातच एक निवांतपणा, शांतता ,भरल्या पोटी आलेला पेंगुळलेपणा आणि समाधान या भावना भरून राहिल्या होत्या.

त्या वेळी या गाण्याचे अर्थ कळायचे नाहीत. पण ही गाणी आजही पुन्हा ऐकली की पुन्हा त्याच भावना दाटतात.

पण इतक्या वर्षांनी आज मला हे लिहावंसं वाटलं कारण आज अभिनव त्याच वयात आहे आणि काल मी गुणगुणल्या नंतर तो ही माझ्यामागे म्हणायला लागला...
यशवंत हो, जयवंत हो...

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...