Wednesday 28 August 2019

पश्चिमा

उगवत्या सूर्याची मला तमा नाही,
सगळे त्याचीच वाट पाहत असतात...

प्रिय मित्रा,
मी जर दिशा असले असते,
तर मी पश्चिमा झाले असते...

प्रत्येक मावळतीला
तू घरी येताना,
दारात तुझी वाट पाहत थांबले असते..

Tuesday 27 August 2019

राजाला गाढवाचे कान आहेत, राजाला गाढवाचे कान आहेत...

माझी एक आत्या आजी होती. आत्या आजी म्हणजे बाबांची आत्या, आजोबांची मोठी बहीण. तिला सगळेच अक्का आत्या म्हणायचे. कधी कधी ती आमच्याकडे राहायला यायची. फार थकली होती. मग राहायला आल्यावर आम्हाला छान छान गोष्टी सांगायची. आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायची. ती आली की लवकर जेवणं करून मुद्दाम लाईट बंद करून आणि झिरोचा बल्ब लावून मिणमिणत्या प्रकाशात आम्ही सगळ्या बहिणी तिच्याभोवती कोंडाळं करून बसायचो. मग ती आम्हाला गोष्टी सांगायची. 
एक राजा होता. राजाकडे सगळं होतं. पैसा, सत्ता, सुख, शांती, समृद्धी सगळं काही होतं. फक्त एकच अडचण होती. ती म्हणजे त्याला गाढवाचे कान होते. इतर वेळी राजमुकुटाखाली ते आपोआपच झाकले जायचे. त्यामुळे प्रजेला किंवा कुणालाच ते कळणं शक्य नव्हतं. पण जेव्हा महिन्यातून एकदा केस कापायची वेळ यायची तेव्हा मात्र राजा खूप गुप्ततेनं एका निष्णात न्हाव्याला रात्रीच्या वेळी बोलावून घ्यायचा. त्याचे डोळे बांधले जायचे आणि मग राजाचे सगळे नोकर तिथून निघून जायचे आणि मग राजा एकांतात त्या न्हाव्यासमोर आपला राजमुकुट उतरवायचा. तो न्हावी मग चाचपडत चाचपडत राजाचे केस कापायचा. आणि नन्तर राजा पुन्हा राजमुकुट घालून बाहेर निघून जायचा आणि मगच त्या न्हाव्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली जायची. 
पण या सगळयामागचं रहस्य मात्र कुणालाच कळायचं नाही. एकदा तो न्हावी राजाचे केस कापून बाहेर येत असताना दारावरचा रखवालदार त्याला विचारतो. "राजा तुला नेहमी रात्रीच का बोलावून घेतो? आणि त्यातूनही तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधतो. असं का? यामागचं रहस्य काय?"
त्या वेळी त्या प्रश्नाचं उत्तर त्या न्हाव्यालापण देता येत नाही. पण आता मात्र तो त्या प्रश्नानं पुरता व्याकुळ होऊन जातो. आणि पुढच्या महिन्यात आमंत्रण आलं की काहीतरी करून डोळ्यांची पट्टी काढून काय आहे ते पाहायचं असा निश्चय करतो. तो कसाबसा एक महिना घालवतो. आणि आमंत्रण आलं की उत्सुकतेनं राजाकडे जातो. आणि केस कापताना हळूच डोळ्यावरची पट्टी काढून पाहतो तर त्याच्या लक्षात येतं, 'राजाला गाढवाचे कान आहेत!!' बस्स!! कशीबशी राजाची कटिंग उरकतो आणि बाहेर पडतो. त्याला रात्रभर झोप लागत नाही. आपल्याला हे रहस्य कळलंय हे त्याला कुणाला कळू द्यायची इच्छाही नसते आणि ते सत्य त्याच्या पोटात राहायलाही तयार नसतं. त्याचं पोट दिवसेंदिवस वाढायला लागतं आणि दिवसेंदिवस जास्त जास्त दुखायला लागतं. आता काय करावं हा विचार करताना तो एका जंगलात पोहोचतो. शेवटी एका झाडाच्या बुंध्यापाशी तो हळूच ते राजाचं रहस्य सांगून मोकळा होतो, "राजाला गाढवाचे कान आहेत. राजाला गाढवाचे कान आहेत." आणि मग तो त्या रात्री घरी जाऊन शांतपणे झोपतो. 
थोड्या दिवसांनी एक सुतार तिथे येतो आणि ते झाड कापून घेऊन जातो. त्याच लाकडाची मग तो वाजवायची पेटी तयार करतो. आणि पेटी तयार झाली की आता वाजवून पाहू म्हणून वाजवायला लागतो तर त्या पेटीतून आपोआपच आवाज येतो, "राजाला गाढवाचे कान आहेत. राजाला गाढवाचे कान आहेत." 
अत्याआजीची गोष्ट इथंच संपते पण आज मला अचानक ती आठवली आणि वाटलं आपण सगळेच कधीतरी आपले गाढवाचे कान लपवणारे राजे असतो का?
..अमृता देशपांडे

Friday 16 August 2019

ग्रेस


ग्रेस 
गूढ, गहन, गभिरग्रेस..ग्रेसांबद्दल लिहायचं ठरल्यानंतर त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेली काही पुस्तकं मिळतात का हे बघण्यासाठी मी जवळच्याच वाचनालयात गेले आणि तिथल्या ग्रंथपालाला ग्रेसांची काही पुस्तकं असतील तर द्या असं म्हटलं त्या बाईं सहजच ग्रेस खरंच मोठे कवी होते नं? असं म्हटलं. पण मला मात्र ग्रेस अजून गेले कुठे, ते आहेतच की अजून. असा उगाचच एक भास होऊन गेला. नंतर विचार करताना तो भास नव्हता असंही जाणवलं, कारण ग्रेस आहेतच की प्रत्येक माणसात! कारण ग्रेस ही काही नश्वर व्यक्ती नव्हे..तो एक विचारांचा, अभिव्यक्तीचा, कल्पनेचं बंड करणारा आणि स्वत:ला माणसाच्या सुखापेक्षा दु;खाचा प्रतिनिधी मानणारा अखंड कोसळणारा प्रपातच आहे!!
असं म्हणण्याचं कारण म्हणजे ते स्वत:च स्वत:ला दु:खाचा महाकवी म्हणतात. ते म्हणतात,
मी महाकवी दु:खाचा, प्राचीन नदीपरी खोल,
दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल
मी पुरुष असताही तू बिल्वर मजला भरले,
करुणेच्या सर्व कळांचे डोहाळे मज लागले..
या ओळी वाचताना, दु:खातूनही समरसून जगताना, दु:खाच्या दगडाचे याचकाला मात्र नेहमी आनंदाच्या फूलात रुपांतर करुन देणार्या राधेयाची आठवण होते.. !!
खरंतर ग्रेस हा काही समोर दिसेल ती वस्तूस्थिती यमकं जूळवून लिहीणारा कवी नाही. त्यांच्या अभिव्यक्तीचा प्रकारच पूर्ण वेगळा आहे. त्यांच्या उपमा, त्यांची शब्दयोजना आणि त्यांच्या कल्पना या खोल अंतरात्म्यातून घूमल्यासारख्या प्रतिध्वनीत होत होत शब्दरूप घेऊन आपल्यापतर्यन्त पोहोचतात तेव्हा त्यांची एक गूढरम्य कवीता झालेली असते.
त्यामुळे ग्रेसांच्या कवितेचा काही एकच असा अर्थ कधी निघत नाही. प्रत्येकाला तो आपापल्या कुवतीप्रमाणे उलगडत जातो. त्यामुळे मला सुरुवातीला अश्या दुर्बोध वाटणार्या माणसात असामान्य कवी आहे हे कोणी ओळखलं असेल? आणि या माणसातलं कवित्व जगासमोर आणणार्या माणसाची प्रज्ञा आणि मेधा किती प्रचंड विस्तारलेली असेल असे बाळबोध प्रश्न मला नेहमी पडायचे. एका ठिकाणी त्याच माणसानं खुलासा केला आहे.
मी असा एकदा नागपूरच्या रस्त्यावरनं जात होतो. तेव्हा समोरुन दोन माणसं येताना दिसली. त्यातला एक पायानं अधू होता आणि तो दुसर्याचा आधार घेऊन जात होता. मी त्या दोघांशी बोललो तेव्हा त्या दोन महारथींची नावं सुरेश भट आणि माणिक गोडघाटे असल्याचं कळलंत्यानंतर मी त्यांना काही कवीता मागितल्या आणि मीच त्या कवितांना चाली लावणार होतो.
 त्यातले माणिक गोडघाटे म्हणजेच आपले कवी ग्रेस आणि हा प्रसंग सांगणारे संगीतकार म्हणजे आपले लाडके  पंडित हृदयनाथ मंगेशकर हे होते!!

माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७  रोजी नागपुरात झाला. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर
या गावचा माझा जन्म, माझी नाळ तोडून याच गावच्या मातीत गाडली गेली. इथे माझे शिक्षण झाले. बाकीच्या सगळ्या वयाच्या, आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या परिक्रमा ईथेच सुरु आहेत. ईश्वराची कृपा हा माझ्या जगण्याचा मुलाधार आहे. मी सकाळी ४ वाजता उठतो आणि पोहायला जातो, जेव्हा कुणालाही जाग आलेली नसते तेव्हा मी पोहून परत आलेला असतो. कारण मला लिहायचं असतं, मला माझ्या प्रार्थना उभ्या करायच्या असतात. मी म्हणतो, “माझ्या तथाकथित निर्मिती विश्वावर जीव जडवणार्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला सुखाचे ठेव. आणि देवा जर जमले तर या माझ्या निमुळत्या, छोट्याश्या बालमुठीतल्या प्रचंड आणि इवल्याश्या कवितेवर जगात कुणालाही मात करु देऊ नकोस. देवा त्याबरोबरच माझ्या सभ्यपणावरही कुणालाच मात करु देऊ नकोस.. poetry is not my achievement.How poetry will be my achievement my dear friends and my der enemies? Had it been my achievement then दोन ग्रेस झाले असते तीन ग्रेस झाले असते..पण ग्रेस एकच आहे.
हे ही दुर्बोध आहे का हो? महणजे गेली ३५ वर्षे महाद्वाराने आणि मागच्या दाराने माझी कविता गुणगुणता  आणि मलाच काहीतरी डोळे वटारुन का पहाता मेलं? सात पुस्तकं लिहिली तरी मी भाषण देऊन स्पष्टीकरणच देऊ का? हे मला नाही कळत. हा काय मतलब आहे मला कळतच नाही. माझ्या पेशींचे तुकडे पडत गेले , माझ्या हृदयातलं रक्त झडत गेलं आणि तुम्हाला कुठलीही झुळूक जखम करत नाही..याला काय अर्थ आहे?”
मला स्वत:ला भाबडेपणाने असे वाटते की कवीचे जगणे आणि त्याचे तथाकथित लिखणे यातून त्याच्या शरीराची आणि तितकीच त्याच्या आत्म्याची झीज होत असते आणि काहीवेळेला हा आघात आणि स्फोट जर जबरदस्त असतील तर त्याचे तुकडेही पडत असतात. ती झीज आणि पडलेले तुकडे पुन्हा जोडता येत नाहीत. असा माझा समज आहे.

शेवटच्या काही दिवसांत ग्रेस पुण्यातच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात होते. तेव्हा त्यांना अमेरिकेत रहात असलेला एक मराठी मुलगा भेटायला आला आणि त्यानं खूप प्रेमानं ग्रेसांना अमेरिकेला त्याच्या घरी रहायला यायचं आमंत्रण दिलं. त्यावर ग्रेस म्हणाले मी नक्की येईन अमेरिकेला, जगायला नाही मरायला!! त्या मुलाला काही कळेना, मरायला येईन हा काय प्रकार आहे? यावर ग्रेसांनीच खूलासा केला..या भुमीचे माझ्यावर इतके उपकार आहेत की मी इथे मरु इच्छित नाही. या प्रसंगी ग्रेस कवितेतून काय म्हटले असते?
भळभळती जखम माझ्या भाळावर अश्वथाम्यासारखी,
संध्याकाळचा तो एकाकी निरवपणा माझ्या माथ्यावर,
दु:खाचे ते बुडून विरुन जाण्याचे  अलोट क्षण माझ्या शीरावर,
पण मी त्या दु:खाचा पर्वत पार करुन तुझ्या दारी आलोय,
तू मला इतकं दिलयस,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
तू मला तुझ्या भूमीवर प्रसवलंस,
माझ्या कवितांना प्रसवलंस,
तुझ्या मुशीतून ग्रेस जन्माला घातलास,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
की हे मराठी माते,
मी तुझ्या भुमीवर मरु इच्छित नाही!!

२६ मार्च २०१२ या दिवशी ग्रेस यांना याच ठिकाणी परलोकाचं आमंत्रण आलं आणि ते म्हणून गेले
मी खरेच दूर निघालो, तू येऊ नको ना मागे..



  ….अमृता देशपांडे
     amrutadeshpande.1414@gmail.com


Thursday 15 August 2019

अन्न


अन्न
माणसाच्या अन्नाच्या प्रवासाबद्दल जे काही आतापर्यंत वाचलंय, त्यावरून काही गोष्टी कळल्या. माणसाची उत्क्रांती  आणि त्याच्या बरोबर निसर्गामध्ये झालेले बदल, हिम पर्व ते ऋतूंची निर्मिती, एप ते माणूस हे तिन्ही प्रवास काळाच्या साधारणतः एकाच टप्यात घडत गेले, एकमेकांना पूरक ठरले. 
साधारणतः ९-१० हजार वर्षांपूर्वी माणूस निसर्ग, पाऊस पाणी, सूर्य-चंद्र- पृथ्वी यांचं परिभ्रमण यांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्यामुळे कोसळणारा पाऊस, लकाकणाऱ्या विजा, सूर्याचं उगवणं- मावळणं, या गोष्टींचं त्याच्या मनात कुतुहुल होतं तसंच या निसर्गशक्तीची भीती सुद्धा होती. या भीतीतूनच मग कोणीतरी अज्ञात शक्ती हे सर्व घडवून आणते असा विश्वास दृढ होत गेला आणि जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना सुरू झाल्या. यातूनच पुढे अनेक धर्म निर्माण झाले. तेव्हा उजेडाचं आकर्षण होतं, तसंच अंधाराची भीतीही होती. अंधार पडला, सूर्य मावळून गेला की सगळं जीवनच ठप्प होत असावं; आणि चमत्कार झाल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला की आनंदी आनंद!! दिवसाचा वेळ जेवढा तेवढाच कामाचा, जागं राहण्याचा वेळ.  माणूस फळं, कंदमुळं, बेरीज, लहान लहान कीटकं असं काहीही खात होता पण मुख्य अन्न हे शिकारीवर अवलंबून होतं. त्या काळीसुद्धा लिंग आणि वयानुसार श्रमविभागणी झाली होती. स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध माणसे  वस्तीच्या जवळपास फळं आणि लहान सहान कीटकं गोळा करायची. पुरुष मात्र दिवसभर शिकार करायला जायचे. जी शिकार मिळेल ती संध्याकाळी सगळे मिळून  समारंभपूर्वक खायचे. यातूनच 'डिनर'चा उगम झाला. डिनर म्हणजे कामाचा दिवस संपल्यावर संध्याकाळी, सर्वांनी मिळून भरपेट करायचे जेवण!  त्यांनतर अंधार पडल्यावर माणूस काहीच करू शकत नसायचा. त्यामुळे एका जागी शांतपणे झोपणं किंवा बसून राहणं याशिवाय पर्याय नव्हता. उजाडलं की ब्रेक फास्ट! त्या काळी खरोखरच रात्रीचा उपास घडत असणार आणि हा उपाशी राहण्याचा कालावधी मोठा असणार. म्हणून उजाडल्यावरच्या खाण्याला ब्रेकफास्ट म्हटलं गेलं असावं. ब्रेकफास्ट म्हणजे आधल्या रात्री जे काही मांस उरलेलं असेल ते आणि त्या सोबत गोळा केलेली फळं इत्यादी. हा ब्रेकफास्ट करून माणसं पुन्हा शिकारीला निघत, स्त्रिया गॅदरिंग म्हणजे गोळा करण्याच्या, जमवून ठेवण्याच्या कामाला लागत. हे करतांनाच स्त्रियांनी बियांपासून झाडं कशी उगवतात, त्यांना परत फळं कशी येतात हे निसर्गाचं निरीक्षण करून समजून घेतलं. यातूनच माणसाचा पहिला सृजनाचा आविष्कार म्हणजे शेती चा उगम झाला! म्हणजे पहिली शेतकरी ही स्त्री होती!!  मधल्या काळात म्हणजे आठ हजार वर्षांपूर्वी माणसाला आगीचा शोध लागला. ही आग माणसाला उजेड आणि ऊब द्यायची! माणसाचं हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण करायची. त्यातूनच अन्न कधीतरी आगीत भाजून खाल्लं गेलं आणि 'पाककला' विलक्षण गोष्टीचा उगम झाला. पण याच आगीमुळे माणसाचा जागं राहण्याचा वेळ वाढला. त्यातूनच मग ब्रेक फास्ट आणि डिनर यांच्या मध्ये काहीतरी खाण्याची गरज निर्माण झाली. या दुपारच्या वेळी सगळे कामात असतात पटकन काहीतरी सुटसुटीत खाऊन परत कामाला लागायचं असतं. तेव्हा आकाराने मोठे, सूप सारखे पातळ पदार्थ टाळून, सँडविच, बर्गर, पिझ्झा, पेस्टी (पेस्ट्री नव्हे), सारखे हात जास्त खराब न होता, उभ्या उभ्या किंवा कामाच्याच टेबलावर  बसून काम करता करता खाण्याचे पदार्थ निघाले असावेत. सतराव्या शतकात याला 'लंचॉन' हे नाव मिळालं. काळाच्या ओघात ते नाव सुद्धा माणसाने सुटसुटीत करून 'लंच' करून टाकलं!! आता ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे खाण्याचे प्रकार नियमित झाले होते, सगळीकडे accept झाले होते. मध्ये नवव्या शतकात कलदी नावाच्या मेंढपाळाला कॉफीचा शोध लागला होता आणि सगळ्या जगाला दारू आणि पाणी यांच्याशिवाय एक चांगलं स्फुर्तीदायक पेय मिळालं होतं! नन्तर सकाळी उठल्यावर मरगळ घालवण्यासाठी कॉफी प्यायला सुरुवात झाली. चहा तर इसवी सना पूर्वी दोन हजार वर्षांपासून चीन मध्ये पिला जात होता. तिथून तो सगळीकडे पसरला. अठराव्या शतकांनंतर जीवनाने सगळीकडेच वेग घेतला होता. अनेक शोध लागत होते. चाक, सायकल, गाड्या, वाफेचं इंजिन, वाचन- लिखाणाची मध्यमं, करमणुकीची साधनं वाढत होते. हिंदुस्थान, चीन, इजिप्त मध्ये अनेक संस्कृती उदयाला येत होत्या. कला, शास्त्र, तत्वज्ञान, मॅनेजमेंट या गोष्टींनी माणसाच्या जीवनाला अनेक पदर मिळत होते. जीवन म्हणजे 'फक्त जिवंत राहून वेळ व्यतीत करणं' ही आदिमानवाची कन्सेप्ट केव्हाच मागं पडली होती. माणसाचे एका दिवसात सक्रिय राहण्याचे तास वाढत चालले होते. १८०० साली विजेच्या दिव्याचा शोध लागला. आता माणूस रात्री जास्तच सक्रिय राहू लागला होता. तशी डिनरची वेळ पुढे पुढे चालली होती. आधी सूर्यास्ताच्या सुमारास होणारं डिनर आता ८ -८:३०वाजता व्हायला लागलं. त्यामुळेच मग लंच आणि डिनर च्यामध्ये काहीतरी खायची गरज निर्माण झाली. इंग्लंडचा ड्युक ऑफ बेडफोर्ड फ्रान्सिस रसेलची बायको अँना मारिया हिला सुद्धा भुकेने वेड लागायची वेळ यायची. यावर तोडगा म्हणून तिने १८३९साली तिनं आपल्या नोकरांना दुपारी पाच वाजता चहा आणि त्या बरोबर काही केक रोज वाढायला सांगितलं. हीच 'हाय टी' ची सुरुवात. म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यावर चहा पितो, नाष्टा मग दुपारचं जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण करतो त्यामागे इतका मोठा इतिहास असेल असं वाटलं होतं
आत एकविसाव्या शतकात माणसाला दिवसाचे चोवीस तास सुद्धा अपुरे पडायला लागलेत.. म्हणूनच की काय आजचे आहारतज्ज्ञ दर दोन तासांनी खायचा सल्ला देतात....

Wednesday 14 August 2019

पुरीया धनाश्री...


पुरीया धनाश्री...

सकाळपासून काम, घाई गडबडीचं सुरू झालेलं अव्याहत चक्र संध्याकाळ व्हायला लागली की थोडं रेंगाळतं. शरीराबरोबरच मनालाही थोडासा थकवा आलेला असतो. सगळ्यांचं सगळं करता करता कधी आनंद होतो पण बऱ्याचदा आपल्याला काय पाहिजे होतं तेच विसरायला होतं! या सूर्य कलण्याच्या वेळी, आपापल्या घरी जाण्याच्या वेळी, आभाळ संधीप्रकाशानं भरून जाण्याच्या वेळी ऐकायचा हा राग..

आजरा दिन डुबा
अब तू ध्यान धरिलो रे ।।
साँज आई घेरी है
रंग जो चाहे भरिलो रे ।।

 पंडित कुमार गंधर्वांनी ही बंदिश ग्रीष्मातल्या संध्याकाळसाठीच योजली होती.
आता दिवस मावळतीला आला आहे. केलंस नं दिवसभर काम, दगदग केलीस. आता जरा शांत बस, एकाग्र हो. स्वतःच्या आत काय चाललंय ते बघ जरा. दिवसभर सगळ्यांच्या मागण्या पुऱ्या करता करता तुला स्वतःला नेमकं काय पाहिजे हे विचारलंस का कधी स्वतःला? आता विचार. बघ ती ग्रीष्मातली संध्याकाळ तुला काहीतरी देतेय, जणू आभाळाचा रिकामा कॅनव्हास तुझ्यापुढे अंथरलाय जो पाहिजे तो रंग भर..सगळं तुझ्या हातात आहे. जरा शांत होऊन विचार तर करून बघ!!!
हेच तर त्या पुरीया धनाश्री ला सांगायचं नसेल?? असा विचार गेले अनेक दिवस मन व्यापून होता. 

पण सगळ्यात पहिल्यांदा जो पुरीया धनाश्री ऐकला होता त्यांनतर अगदी वेडच लागलं होतं. त्याचं वर्णन मी कधी तरी लिहून ठेवलं होतं...
"आता अगदी अमृता प्रीतम सारखं झालंय माझं. स्वयंपाक करताना अचानक काहीतरी सुचतं आणि मग लिहायची उर्मी शांत बसू देत नाही. जे मनात आलं आहे ते कागदावर उतरवल्याशिवाय शिवाय चैनच पडत नाही. हातातलं काम पूर्ण करू आणि मग लिहू म्हटलं की तेव्हा सुचलेल्या कल्पना तितक्याश्या मोहक वाटत नाहीत. त्यामुळे आता तशीच बसलेय लिहायला, स्वयंपाक अर्धवट टाकून...
संध्याकाळचे ६-६:३० वाजले आहेत. भीमसेनांचा पुरीया धनाश्री चालू आहे, त्या तालावर माझं भाजी चिरणं, पोळ्या लाटणं चालू आहे. हा राग ऐकायची हीच खरी वेळ. ते ऐकण्यात मी इतकी दंग होऊन गेले होते की मला हे गाणं नसून एक पंचेंद्रिय व्यापून टाकणारा एक अनुभवच वाटला. 
गाणं संपलं आणि काही सेकंदानी मला अचानक उन्मळून रडूच यायला लागलं. रडण्याचा पहिला भर ओसरल्यावर मलाच प्रश्न पडला का रडत होते मी? अं? आठवेचना काय झालंय...मग लक्षात आलं, भीमसेनजींच्या पुरीया धनाश्रीनं एव्हढी प्रचंड हुरहूर आणि ओढ लावली होती की मला जीवाच्या जीवलगाची ताटातूट झाल्यासारखंच वाटलं! खरंतर हा योग्य वेळी योग्य ते आणि महान ताकदीच्या गायकाचं गाणं ऐकल्याचा परिणाम होता!! 

फार पूर्वीपासून पुरीया धनाश्री मला सूर्यास्ताच्या वेळेस प्रियकराची वाट बघणाऱ्या विरहिणीसारखा वाटत आलाय. संध्याकाळची वेळ आहे. ती हिरवी नऊवारी नेसून, वेणी-फणी करून वाड्याच्या दारात उभी आहे. दाराच्या शेजारच्या पंचकोनी कोनाड्यात तिनं दिवा लावला आहे. त्या प्रकाशात दाराचे पितळी कडी-कोयंडे, सागवानी पॉलिश चमकतंय. आकाशात केशरी-कातर रंग पसरलाय. तोच रंग तिच्या आरक्त, वाट पाहणाऱ्या चेहऱ्यावर उतरलाय. डोळे दूरदूरपर्यंत कोणालातरी शोधताहेत. वाऱ्याच्या मंद झुळुके बरोबर तिच्या केसांची एक बट गालावर रेंगाळतेय. ती तशीच उभी आहे, एका दाराला रेलून, त्याची वाट पाहत ओढीनं... अजूनही पुरीया धनाश्री!!!"


Tuesday 13 August 2019

कुमार गंधर्व: एक सृजनयात्रा


कुमार गंधर्व: एक सृजनयात्रा

     कुमारांबद्दल लिहायला मी काही शास्त्रीय गायिका किंवा संगीत विश्लेषक नाही आणि त्यांच्या जीवनकहाणीबद्दल लिहिणं तसं काही नवीन नाही, अनेकांनी अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल लिहिलंय, संशोधन केलंय. तरीही मला स्वतःला कुमार कसे दिसले, का भावले, ते सांगायचा हा एक प्रयत्न.
     पंडित कुमार गंधर्व किंवा नुसतंच कुमार म्हटलं तरी अजूनही एक अनामिक प्रकारचं गूढ आकर्षण वाटतं. कितीही ऐकलं तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवं गवसतं. चला, आता घरंदाज घराण्यातल्या या गायकाचा हा ‘घरंदाज’ राग ऐकू किंवा अमुक एक गाणं फार नावाजलं गेलंय म्हणून आपणही तेच ऐकू, तेच ग्रेट, बाकीचे स किस झाड की पत्ती... हा अॅटीट्युड बाळगून गाणं ऐकायला गेलं की संपलंच सगळं. मग त्यातली कला सोडून माणूस शास्त्राच्याच मागे लागतो. गाणं ऐकताना माझी पाटी कोरी असते. गाणं ऐकताना आपण त्यात समरस होऊ शकलो, त्यातले भाव आपल्यापर्यंत पोहोचले, अगदी भिडले, तर ते खरं गाणं, या पेक्षा वेगळा निकष मी मानत नाही. जे साहित्य, संगीत, कला, अंतर्मुख करते, मनात भावनांचं अत्युच्च शिखर गाठवते, तेच खरं साहित्य, संगीत किंवा कला. कुमारांचं गाणं ऐकताना ही एकतानता अनेक वेळा अनुभवायला येते.
     त्यांच्याच शब्दात सांगायचं तर “गाणं ही अशी कला आहे की, जी गोष्ट इतर कुठल्याच माध्यमाने सांगता येत नाही ती गाण्याने सांगता येते आणि हे मला पूर्णपणे पटलेलं आहे....” म्हणूनच त्यांच्या गाण्यातून असंख्य भावतरंग उमटू शकतात!!
कोण होते हे कुमार गंधर्व?
     शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली या मुलाचा जन्म ८ एप्रिल १९२४ ला बेळगाव जवळच्या सुळेभावी नावाच्या गावात झाला. दोन मोठ्या भावांनंतरचं हे तिसरं अपत्य! वडिलांना गाण्याची आवड होती. दोघे मोठे भाऊ गाणं शिकत होते. वयाच्या ७व्या वर्षा पर्यंत शिवपुत्राने गाण्याबद्दल काहीही व्यक्त केले नाही. आवडही नाही आणि नावडही नाही, आणि सातव्या वर्षी एकदम गायलाच लागला..तेही शास्त्रीय संगीत!! दोन तंबोऱ्यांच्यामधेच जाऊन जाऊन बसला तो!! आणि गायला काय लागला तर... त्या काळातल्या अनेक नामवंतांची गाजलेली शास्त्रीय गाणी, भजनं, आणि बंदिशी!! ७ वर्षांचा हा मुलगा अब्दुल करीम खाँ, रहिमत खाँ, हिराबाई बडोदेकर यांच्या गायकीची सही सही नक्कल करतो अशी ख्यातीच झाली होती.. मग अनेक मैफिलींमध्ये त्याची गाणी होत. त्याच दरम्यान गुरुकमळस्वामींना त्याने गाणं ऐकवलं तेव्हा त्यांनी याला “ये कुमार, गंधर्व है|” असं म्हणून ‘कुमारगंधर्व’ अशी पदवीच सुवर्णपदकावर कोरून दिली होती! आता तर हा कुमार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. गाणं कितीही अवघड असो, कुमारांना ते गाणं कधीही अशक्य नसे. अनेक मैफिली ते आता करायला लागले होते. त्यांच्या कार्यक्रमाच्या पेपर मध्ये बातम्या, जाहिराती यायच्या. अनेक दिग्गज लोक याचं गाणं ऐकायला यायचे. पेटी, तबला वादक, तंबोरा घेऊन बसणारे अशी त्यांची ‘कुमार गंधर्व संगीत पार्टी’ नावाची टीमच होती!!  
     १ मार्च १९३६ रोजी मुंबईच्या जीना हॉल मध्ये झालेली एक मैफल मात्र फारच महत्वाची ठरली. कारण यात प्रेक्षकांमध्ये खूपच महत्वाचे लोक बसलेले होते. त्यापैकीच एक होते, इंडियन स्कूल ऑफ म्युझिकचे संस्थापक आणि प्रसिद्ध संगीत शिक्षक बी. आर. देवधर. त्यांनी कुमारचं गाणं ऐकलं आणि ते त्यांच्या वडिलांशी बोलले. आज हा मुलगा प्रसिद्धीच्या शिखरावर आहे, उद्या काय? अशी नक्कल कितीही केली तरी ती शेवटी नक्कलच, असं किती दिवस चालणार? अजून ४/५ वर्षात याचा आवाज फुटेल तेव्हा कशी करणार नक्कल? याला खरंच गाण्यात काहीतरी करायचं असेल, इतक्या चांगल्या टॅलेंटचं चीज व्हायचं असेल तर त्याला नीट गाणं शिकवा, माझ्याकडे पाठवा. त्यानंतर याची वर्णी लागली इंडियन स्कूल ऑफ म्युझिकमध्ये. इथे त्याचं खरं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरु झालं. देवधरांचं एक वैशिट्य म्हणजे त्यांचा भारतीय शास्त्रीय संगीताव्यतीरक्त इतर देशांतल्या संगीताचा सुद्धा तितकाच अभ्यास होता. ते मूळचे ग्वाल्हेर घराण्याचे गायक पण त्यांच्या क्लास मध्ये भारतातल्या सगळ्या घराण्याचे सगळे दिग्गज गायक येऊन गायचे. देवधर या सगळ्या दिग्गजांना त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवायला लावत असत. त्यामुळे कुमार अनेकांकडून अनेक गोष्टी शिकले. सगळ्याच घराण्यांची गायकी शिकले. तिथे त्यांना विशाल दृष्टीकोन मिळाला. कुमारांची गायकी प्रगल्भ झाली.
     त्याचीच एक गोष्ट, एकदा ते विदुषी अंजनीबाई मालपेकरांकडे गेले होते. त्या फार महान गायिका होत्या पण आपलं गाणं ऐकण्यापेक्षा लोक आपल्याला बघायला येतात असं लक्षात आल्यामुळे त्यांनी वयाच्या २५व्याच वर्षी जाहीर मैफिलीत गाणं सोडून दिलं होतं. त्या कधीकधी कुमारांना शिकवत असत. त्या दिवशी अंजनीबाई कुमारांना शिकवताना अस्वस्थ होत्या, कुमारांनी विचारलं, “माई काय झालं?” त्या म्हणाल्या, “अरे हा शुद्ध मध्यम मला हवा तसा लागत नाहीये” कुमारांना तर तसं काहीच वाटत नव्हतं. माई छानच गात होत्या. माईंनी त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. दुसया दिवशीही हाच प्रकार!! असं सलग चार दिवस झालं... चवथ्या दिवशी माईंचा तो मध्यम असा काही लागला, की माई, कुमार आणि तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात घळघळ पाणीच आलं!!! त्या दिवशी कुमार स्वर परफेक्ट कसा लावायचा हे शिकले. त्यानंतर त्यांनी सर्वच स्वर असे लावायचा ध्यासच घेतला.  
     देवधरांकडे शिकायला सुरुवात करून आता १० वर्षे झाली होती. आता पुन्हा कुमार मैफिलीत गायला लागले होते. १९४७ साली त्यांनी कराचीच्या भानुमती कंस या आपल्याच सहाध्यायीशी लग्न केलं. सगळं छान चाललं होतं. भारतभर त्यांना प्रसिद्धी मिळत होती आणि १९४८ साली कलकत्याची एक मैफल करून येत असतानाच त्यांना प्रचंड खोकला सुरु झाला, ताप आला.... आणि TB डीटेक्ट झाला. अगदी जीवावर बेतणारा!! आत्ता कुठे देवधरांकडचं शिक्षण संपलं होतं, मुक्तपणे ते गाणं करायला लागले होते. वयाची २४/२५ वर्ष म्हणजे एखाद्या गायकाच्या करियर मधला महत्वाचा टप्पा. आता गाणं थांबवायचं म्हणजे त्यांचा श्वासच बंद करण्यासारखा होतं. डॉ. मधू देशमुखांनी त्यांना सक्तीची विश्रांती तर सांगितलीच पण एखाद्या कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहायला सांगितलं. मुंबई सोडायला सांगितली. त्याप्रमाणे कुमार भानुसहित मध्य प्रदेशमधल्या देवासला स्थाईक झाले. गाणं बंद झालं आणि पर्यायाने आर्थिक उत्पन्न सुद्धा बंद झालं. घर चालवण्यासाठी भानुमतीने एका शाळेत प्राथमिक शिक्षिकेची नोकरी पत्करली. किती अवघड परिस्थिती असेल, विचार सुद्धा करवत नाही. गायचं नाही, अंथरुणावर पडून राहायचं, अशक्तपणा आलेला, न थांबणारा खोकला, घराबाहेर पडायची बंदी... गंधर्वाचं गाणंच बंद!! आजारपणात साध्या माणसाला सुद्धा नैराश्य येतं तर कुमारपणीच गंधर्वपद प्राप्त झालेल्या या महान गायकाला इतका जीवघेणा आजार झाल्यावर त्यांना सुद्धा नैराश्य येणं साहजिकच आहे. या काळातल्या पुण्याच्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “भानूची ओढाताण होतेय सगळं सांभाळताना. एक दिवस माझी अवस्था पाहून असस्थ झालेली भानू उन्मळून रडायलाच लागली. तिला सहनच झालं नाही. मी तिला म्हटलं, भानू, तू रडू नको, गायल्याशिवाय मी मरणार नाही” हा दुर्दम्य आत्मविश्वास पाहिला की थक्क व्हायला होतं!!
     त्याही अवस्थेत त्यांनी गाण्याचा विचार सोडला नाही. पडल्या पडल्या ते अनेक रागांचं मनन चिंतन करत असत, काही स्फुरलं तर लिहून ठेवत असत. या काळात त्यांनी अनेक बंदिशी लिहिल्या. अतिशय महत्वाचं म्हणजे देवास जवळ असणाऱ्या माळवा प्रांतातल्या विपुल अश्या लोकसंगीताचा अभ्यास केला. भानुमती लोकगीतं म्हणणाऱ्या लोकांना घरी घेऊन यायची, कुमार ते ऐकायचे आणि त्याचं नोटेशन करून ठेवायचे, अभ्यास करायचे. थोडं बरं वाटायला लागल्यावर ते स्वतःच सगळीकडे हिंडून या लोकधूना गोळा करायचे... याच लोकधुनांतून त्यांनी ९ धूनउगम राग निर्माण केले. त्याचं सांगणं होतं की सगळं संगीतच मुळी या लोकधुनांतून उत्क्रमित झालं आहे. आधी लोकधुन, लोकसंगीत मग शास्त्रीय संगीत. राग संगीत आणि भावसंगीत हे काही वेगळे नाहीत. सूर, ताल, लय सगळं असूनही ज्यात भावना नाहीत ते संगीतच नाही!!
     अखेर दुसरं महायुद्ध संपता संपता streptomycine या प्रतिजैविकाचा शोध लागला आणि TB वर औषध उपलब्ध झालं. त्याने कुमार बरे झाले. जवळ जवळ ५ वर्षानंतर त्यांना पुन्हा गाण्याची परवानगी मिळाली. तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये जे गाणं सदर केलं, ते ऐकून लोक अचंबितच झाले. इतकं तरल, मनाचा ठाव घेणारं आणि तरी सुद्धा कोणत्याच घराण्याच्या चौकटीत न बसणारं असं गाणं होतं ते!
     मुंबईचा कार्यक्रम झाल्यावर ते पुण्याला येणं साहजिकच होतं, पु.ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, अशी जिवाभावाची मित्रमंडळी त्यांची वाट पाहत होती. पु.लंनी एक आठवण सांगितली आहे, सबकुछ पु.ल. असलेला गुळाचा गणपती या सिनेमाचं शुटींग आळंदीच्या जवळ कुठेतरी चाललं होतं. तेवढ्यात कुणीतरी निरोप घेऊन आलं, “भाई, कुमार आला आहे आणि तो गाणार आहे” त्याबरोबर पु. ल. आळंदीच्या अबीर बुक्क्यासाहित पुण्याला आले आणि कुमार काय गायले?
मंगल दिन आज बना घर आयो,                                                                                
आनंद मन भराय बावरी भई मैंतो....
निखळ आनंद देणारा हा मालवती...खरचच तो दिवस मंगल, आनंदी होता... तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे कान तृप्त झाले. आज काहीतरी छान ऐकल्याचं समाधान मिळालं. त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट ही होती की कुमार बरे झाले होते, ते आता गाऊ शकणार होते..एक अरण्यपर्व संपलं होतं.
     या आजारपणामुळे त्याचं एक फुप्फुस बंद करून ठेवावं लागलं होतं, त्यामुळे ते एकच फुप्फुस भरून श्वास घेऊ शकत होते आणि गाताना तर दमसास टिकवणे फार गरजेचे असते. मग तरी ते कसे काय गाऊ शकत होते...एकदा त्यांनीच खुलासा केला... “एक लक्षात घे, चिमणीचं फुप्फुस केवढंसं, पण हैराण करते की नाही? अरे, हैराण करायला मोठे फुप्फुस लागत नाही. तसे विचार केले पाहिजेत हैराण करायला.” म्हणूनच गाणं त्यांच्या विचारातच होतं...मनात सतत वास करून होतं.
     हेच गाणं परत बहरत असताना एक अतिशय दुखद घटना घडली, त्यांचा जीव असणारी आणि अनंत कष्ट करून त्यांना आजारपणातून अक्षरशः बाहेर काढणारी त्यांची भानू हे जग सोडून गेली.  आता कुठे जीवनाला बहार आली होती तोच पुन्हा पूर्ण अंधार. भानूचे अंत्यविधी करू येत असताना त्यांना एक गच्च मोहोर आलेलं आंब्याचं झाड दिसलं, तिला आंबे फार आवडायचे. त्याच क्षणी त्यांना एक बंदिश सुचली..
फेर आयी मोरा अंबुवा पे.... आंब्याला फिरून परत बहर आलेला आहे...  तशी तू फिरून परत येशील का? हेच तर विचारायचं नसेल त्यांना? त्यातली व्याकुळता सही सही त्या बागेश्री मध्ये उतरली आहे. त्यांनी दैनंदिन जीवनात घडलेल्या अनेक घटनांवरून बंदिशी केल्या आहेत हे पाहून खूप कौतुक वाटतं.
     त्यांना निसर्गाबद्दल मोठी ओढ होती. ते विचारतात, तुम्ही पहाटे उठता तेव्हा तुम्हाला रात्री झोपताना जसं वाटत असतं तसंच वाटतं का? उन्हाळ्यातली सकाळ आणि हिवाळ्यातली सकाळ सारखीच असते का? नाही ना? म्हणून प्रत्येक राग गाण्याची वेळ वेगळी. त्यातल्याही प्रत्येक बंदिशीचा भाव वेगळा. सकाळी फुलं जशी दिसतात तशीच ती संध्याकाळी सुद्धा दिसतात का? नाही.. म्हणूनच दुर्गा रागातल्या ‘आनंद झारायोरी’ची रात्र कोणतीही असून चालत नाही; ती शरद पौर्णिमेचीच रात्र असावी लागते, आणि पुरियाधनाश्री मधल्या ‘आजारा दिन डूबा’ मधला सूर्यास्त हा ग्रीष्मातलाच असावा लागतो. ह्या बंदिशी आपल्याला अपोआपच जाणीवेतून नेणीवेत घेऊन जातात. अतिशय तरलपणे विचार केल्यावरच हा दृष्टीकोन येऊ शकतो. 
कुमारांनी गाणं फक्त गायलंच नाही तर अनेक बंदिशींची रचना सुद्धा केली.
सिर पै धरी गंग, कमर मृगछाला 
मुंडकी गलमाल, हथेली सुल साजे | 
पिनाकी महाग्यानी, अजब रूप धारे 
डुलत डुल आवे, डमरू डिम बाजे ||
शंकराचं इतकं सुंदर वर्णन इतक्या छान शब्दांत मी आजपर्यंत कुठे ऐकलं नव्हतं! साक्षात शंकर नाचत नाचत समोर उभा ठाकतो...
आणि

रंग ना डारो श्यामजी गोरी पे रे 
पेरी लई ये नयी सारी 
सखी सहेल्या हँस करे देंगी गारी | 
कैसे हो खिलारी, मानत नाहीं 
बरजोरी ना करो जावो मैं तो हारी |
    सोहनी या मध्यरात्री नंतर गायच्या रागामध्ये, एक तरुणी कृष्णाला माझ्यावर रंग टाकू नको असं सांगतेय... कृष्ण, गोपी आणि त्यांच्या रासलीला हा तर तमाम गीतकारांचा आवडीचा विषय. कृष्ण गोपिकांवर रंग टाकतो आणि त्या खेळता खेळता रंग नको टाकू; म्हणजेच टाक, असं सांगत असतात... पण इथे रंग ना डारो श्यामजी हे म्हणणारी युवती किती आर्त विनवणी करतीये. इथे तिला त्याचं रंग टाकणं एकाच क्षणासाठी आवडतंय, लुभावतंय पण सर्वांसमोर दाखवतही येत नाही, समाज लज्जेसाठी तिला त्याला आडवावंसं वाटतंय. त्याने रंग टाकल्यावर आतल्याआत तिला काहीतरी झालंय, ते फार मोहवणारं आहे. त्याच वेळी आपलं भान सुटता कामा नये ह्याची जाणीव होऊन तिला वेड लागायची पाळी आली आहे!!! कुमारांच्या या काव्य आणि स्वरांपुढे आपले शब्द थिटे पडतात...
     कुमारांचं आणखी एक सांगणं म्हणजे लय. प्रत्येक विचार, ख्याल हा स्वतःची एक स्वाभाविक लय घेऊन येतो. प्रत्येक भावनेच्या छटेला एक intensity असते. त्या intensity ची लय ओळखता आली पाहिजे. ते समजलं की ठराविक बंदिश त्याच विशिष्ट लयीत का बांधली असेल हे समजतं. मालवती मधलं चला रे, चला जा रे हे ऐकताना ते विलंबित एकतालात का बांधलं असेल हे उमगतं.
     त्यांच्या मनाचा साधेपणा म्हणजे त्यांनी जे काही निर्माण केलं, नवीन राग, बंदिशी ते सगळं सांगून टाकलं कुठेही लपवा छपवी नाही. गुरूने मुक्त हाताने दिलं पाहिजे. एका मैफिलीत त्यांनी सांगितलं, “आमच्या गुरुंनी सुद्धा ज्यांच्या कडून हे घेतलं, नोटा देऊन विद्या घेतलेली आहे. घेणं भाग होतं, कारण दान करायला तयार नव्हते. म्हणून त्यांच्याकडून विद्या कमी झालेली आहे, आमच्याकडून विद्या(देताना) कमी होणार नाही.” हे ऐकताना हेलावून जायला होतं. खरोखर त्यांनी ‘अनुपरागविलास’मध्ये सगळं काही ज्ञान देऊन टाकलेलं आहे.
     साधारणपणे गाण्याच्या मैफिलीची रचना भूपाळी ते भैरवी किंवा एखादा राग, बडा ख्याल, द्रुत छोटा ख्याल आणि नंतर एखादं उपशास्त्रीय गाणं अशी असते. कुमारांनी या मैफिलींमध्ये अभिनव प्रयोग केले. त्यांना इतकं सांगायचं होतं की सारखं तेच गायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. त्यांनी गीत वर्षा, गीत वसंत, गीत हेमंत सारखे पूर्ण ऋतुचक्र डोळ्यांसमोर उभे करणारे कार्यक्रम केले. कबीराचे निर्गुणी भजनं तर आपल्याला अंतर्मुख करून जातात. शिवाय तुकाराम दर्शन, गोरखनाथ, मीरा, सूरदास जवळपास सगळ्याच संतकविंच्या रचना स्वरबद्ध करून गायल्या. ठुमरी टप्पा तराणा सारखा अगदी वेगळाच कार्यक्रम सदर केला, आज पर्यंत या तिन्ही गायन प्रकारात काही साम्य किवा काही संबंध आहे का हे शोधण्याचा कोणी असा प्रयत्न केला नसावा.
     राघव मेनन म्हणतात त्याप्रमाणे कुमार गंधर्व म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताच्या आकाशात चमकलेली उल्का आहे जिच्या अवकाशातून जाण्याने भारतीय संगीताचे कुमारपूर्वी आणि नंतर असे दोन ठळक भाग झालेले आहेत.
     शेवटी या सगळ्या गायकीतून मला एक जाणवलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला एक प्रतिज्ञा केली आहे;
 तेणे कारणे मी बोलीन, बोली अरुपाचे रूप दावीन||
 अतींद्रिय परि भोगवीन इंद्रीयाकरवी||
    म्हणजे गाणं या माध्यमातून मी बोलीन, माझ्या बोलीतून अमुर्ताचेही रूप दाखवीन आणि जे सर्वसामान्य ज्ञानेन्द्रियाने भोगता येत नाही ते मी रसिकांना साध्या कानांनी भोगवीन...ही प्रतिज्ञा कुमारांनी पूर्ण केल्याचा प्रत्यय येतो...

 अमृता देशपांडे.
                                                                                                                  amrutadeshpande.1414@gmail.com

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...