Monday 26 July 2021

सहजच

 

खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं..

ये नीर कहासे बरसे...

खरतर गेल्या काही दिवसांपासून फक्त फिजिक्सचा अभ्यास करतेय...त्यामुळे सूर्याचा जन्म, सुर्यमालेचा जन्म, ताऱ्यांचा जन्म-मृत्यू..पृथ्वीचा जन्म आणि त्यात निर्माण झालेले ऋतू यांचा अभ्यास चाललेला असताना...
काही कोटी कोटी जीवांपैकी स्वतः ला माणूस म्हणवून घेणारा एक जीव पृथ्वीवर अवतरतो आणि त्याला आपल्या भूक, भय, मैथुन आणि निद्रा या शारीरिक गोष्टींच्या पलीकडे सगळीकडे सौंदर्याचा आविष्कार दिसायला लागतो...या गोष्टीचं मला खूप खूप अप्रूप वाटत आलंय...
त्यानं फक्त कल्पनेनं सौंदर्याचे अनेक स्वर्ग निर्माण केले. त्यानं निसर्गाला सूर्य, चंद्र, झाडं, प्राणी, नद्या यांना आपली श्रद्धा अर्पण केली, त्यांना देवत्व दिलं..
त्यानं भाषा निर्माण केली. त्या माध्यमातून एकाच भावनेचे अनेकानेक पदर वेगळे करून संवाद साधला. नुसतं बोलून भगत नाही असं लक्षात आल्यावर त्यानं संगीत निर्माण केलं, त्यातून त्यानं प्रत्येक भावना उळगडल्या.
त्यानं हातात दगड, रंग, कुंचला, बोरू, पेन, पेन्सिल अशी हत्यारं घेऊन आदिम काळातच चित्रकला सुरू केली.
माणूस हा एकमेव प्राणी आहे की ज्यानं आपल्या अन्नावर संस्कार करून त्यातुन क्षुधाशांतीच नव्हे तर आनंद निर्माण केला.
थंडी वाऱ्यापासून संरक्षणार्थ निर्माण झालेलं वस्त्र आज अगणित रूपांमध्ये विकसित झालंय.
त्यानं आपल्या स्वतःला राहायला निवारा निर्माण केला पण श्रद्धाळू माणसानं त्याआधी आपल्या देवासाठी मंदिराची स्थापना केली आणि मग स्वतःला राहायला निवारा बांधला..
माणसानं केवळ उत्सुकतेपोटी विज्ञान उभं केलं. त्यात त्यानं कधी विश्वाच्या भूत-भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तर कधी मानवी शरीरातल्या मेंदू सारख्या जटिल अवयवाचा मागोवा घेतला तर कधी अणूच्याही अंतरंगात डोकावून देवकणाच्या अस्तित्वाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानं अनेक ज्ञानशाखा आणि कलाशाखा निर्माण केल्या..काही शतकांपूर्वी एखादा विचारवंत त्या काळी उपलब्ध  सगळंच ज्ञान ग्रहण करू शकत होता पण आता कोणा एकाच माणसाच्या समजण्याच्या आवाक्यात नाहीत. आता एखाद्या माणसानं आयुष्यभर अभ्यास केला तर कुठे तो त्यातल्या एखाद्या शाखेतल्या एखादया भागाचा तज्ज्ञ म्हणवतो.
बाकी सगळ्या गोष्टी नश्वर असतील पण माणूस आहे तोपर्यंत या कला आणि विज्ञान अमर्त्य राहतील.
तर असा हा माणसाचा प्रचंड वेगानं चाललेला प्रवास मला कायमच आकर्षित करतो. आणि आयुष्यभर याच प्रवासातली एक पर्यटक म्हणून मी जगणार आहे. जे जे काही नितांत सुंदर असं माझ्यापर्यंत पोहोचेल ते ते माझ्या लेखणीतून पाझरेल याची आता निश्चितपणे शाश्वती वाटते.

Thursday 24 September 2020

मारवा

 

मारवा

काल संध्याकाळच्या सुमारासाला भिमसेनांचा एक वेगळाच मारवा ऐकायला मिळाला आणि मी एकदम आहे त्या वातावरणातून निघून दूर कुठेतरी पोहोचले. काहीतरी सतत चालू आहे, सध्या चालू असलेला प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या मार्गावर असला तरी तो अजून पूर्णत्वाच्या खूणा दाखवत नाही, प्रयत्न करूनही काहीतरी कमी असल्याची भावना आलीये, आताच्या परिस्थितीत सगळं असूनही काहीतरी कमी आहे, सतत कशाचीतरी आस लागली आहे, सगळं जग वेळेच्या त्याच लयीत चाललंय आणि मी मात्र काळाच्या कुठल्यातरी बिंदूवर अडून राहिलेय ती पुढे जायलाच तयार नाही, मुठीत घट्ट दाबून ठेवलेले चार सुखाचे क्षण सोडायला तयार नाही, सगळं असूनही सतत काहीतरी राहून गेल्याची भावना सध्या मन व्यापून राहिलीये आणि अश्या मानसिक अवस्थेत भीमसेनांचा मारवा ऐकायला मिळावा.. हे तर माझंच प्रत्यक्ष रुप माझ्यासमोर ऊभं ठाकलंय.. मीच दूरवरून मला न्याहाळतीये, माझ्याच भावनांना शब्दरूपात साकार होताना मला जाणवत होतंतोच मारवा मी पुन्हा पुन्हा ऐकत होते, संथ लयीत सुरु केलेली आलापी, नंतर राग विस्तार आणि बंदीश आणि त्यानंतर तराणा बस्स..तेच पुन्हा पुन्हा ऐकत होते.. तरीही आपल्याकडून काहीतरी ऐकायचं राहून जातंय अशी रुखरूख लागून राहिलीये .. रात्री झोपताना उद्या उठल्यावर पुन्हा हेच ऐकू असं पक्कं ठरवून नाईलाजानं रेकॉर्ड बंद केली आणि झोपले..

पहाटे उठल्यानंतर तोंडही धुता आधी कानात हेडफोन्सच्या खुंट्या ठोकून घेतल्या आणि तोच मारवा पुन्हा लावला आणि मग बाकी सगळी आन्हिकं..

दुपारपर्यंत मारवा अगदी अंगात भिनला होता. कुमारांची काहीतरी भूमरी.. शब्द शेवटी असणारी बंदीशही आता डोक्यात घोळायला लागली होती. गीतवर्षाची सुरुवात या बंदीशीनं होते हेही नंतर आठवलंउन्हाळा संपत आला आहे. अंगाची काहीली सहन होत नाहीये..उजाड जमीन, झाडांचे सुकलेले देह, माना टाकलेल्या वेली सगळेच पावसाची वाट पहाताहेतआणि वावटळ सुटल्यासारखा कुमारांचा शब्द जातोतपरीया हे मन अत..घनारे ये भूमरी..भूमरीहाच सोसाटा, तीच पाववसाच्या तृप्ततेची वाट मी पहातेय

नंतर आणखीही पुन्हा पुन्हा अनेक मारवे ऐकत गेले मध्येच विजय कोपरकरांनी या सगळ्या अवस्थेला, मारव्यानं आणलेल्या अस्वस्थतेला एकाच शब्दात व्यक्त केलंआणि मी चमकलेच.. अपूर्णता.. मारवा एकच गोष्ट दाखवतो, ती म्हणजे अपूर्णता.. पूर्णत्वाच्या ओढीनं निघालेली अपूर्णता..

मारव्यात दु:खाचा भाव नाही, त्यात सुखाची ओढ आहे. सुखाच्या अभावामुळे आलेली पोकळी आहे, ती पोकळी हा मारवा भरुन काढतो.. आणि यातही इतकं सूख आहे की त्या सुखासाठी, त्या अपूर्णतेच्या शोधासाठी मी कायम मारवा व्हायला तयार आहे.

मारवा हा पुरीया आणि धनाश्री यांच्या जवळ जाणारा राग आहे, पण त्या रागांत मुर्तीमंत विरह आहे. तसा मारव्यात त्या विरहाच्याही पलिकडे त्याच्यावर मात करुन जाण्याचा प्रयत्न आहे. मारव्यामध्ये साक्षात सा आणि या दोन आधारांनाच कमी वापरण्याचा नियम आहे ! त्यामुळेच की काय पण मारव्यामध्ये मधल्यामध्ये तरंगत राहिल्याची भावना येत रहाते. हेच जर वरच्या षड्जाकडे धाव घेतली तर तो उत्तररात्रीचा सोहोनी होतो..

याच मालिकेमध्ये मग वसंतराव देशपांडेंचाही मारवा ऐकला. ते म्हणे चक्क सहा महिने फक्त मारवाच शिकले होते, इतका मारवा गहन आहे ! त्यानंतर अभिषेकी बुवांच्या आधीच गहिर्या असणार्या आवाजातला मारवा तू ही अनादी, तू ही अनंत असं म्हणत त्या ईश्वरलाच मारवा अर्पण केलायतोही अप्रतिमच आहे..

पण खरी आस लावणारा मारवा ऐकावा तो किशोरीताईंचा. अस्वस्थता आणि अपूर्णता आणि पुन्हा त्यामुळे येणारी भीषण अस्वस्थता त्यांच्या बोलन बिन या बंदीशीतून मूर्तीमंत उभी ठाकते..आता पूर्ण होईल, पूर्ण होईल असं अनेकदा वाटूनही ती पूर्णता जाणवू देता पुरेपूर अस्वस्थता आणि व्याकूळता साकारण्यात इतकं यशस्वी कोणी झालं नसावं.. रागाची अपूर्णता तशीच ठेवून किशोरीताई मात्र इथे पूर्णत्वाला पोहोचतात. आणि आपण मात्र आताशी आपला शोध सुरु झालाय अश्या अनिमिषतेच्या गर्तेत शोधत रहातो..आपलीच स्वत:ची पूर्णता

अमृता देशपांडे.

२४/०९/२०

  

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...